जून २०२४ पासून पुढील दहा वर्षांसाठी पाठ्यपुस्तकात राहणार
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
गुजरात राज्यातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी सक्तीच्या मराठी विषयाच्या इयत्ता पाचवीसाठी प्रकाशित केलेल्या मराठी केकारव (प्रथम भाषा) पाठ्यपुस्तकात चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील लोकनेते काकासाहेब जी. जी. चव्हाण माध्यमिक आश्रमशाळेचे पर्यवेक्षक तथा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-चाळीसगावचे कार्याध्यक्ष कवी मनोहर आंधळे यांची “अवतरले शिवराय” ही बालकविताचा जून २०२४ पासून पुढील दहा वर्षांसाठी समावेश केला आहे. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळात कार्यरत मराठी विषय सल्लागार श्रीमती सुदेष्णा मुरलीधर कदम यांनी भ्रमणध्वनीवरुन कवी मनोहर आंधळेंना ही वार्ता कळवली. त्यात त्यांनी नमूद केले की, उपरोक्त कविता फेब्रुवारी २०२० च्या प्रसिद्ध झालेल्या पुण्यातील मासिक “किशोर” मधून निवडलेली आहे. अनावधानाने आपणास उशिराने कळवत दिलगिरी व्यक्त करुन कवी आंधळे यांचे अभिनंदन केले आहे.
यापूर्वीही कवी मनोहर आंधळेंची “जिंकू आम्ही लढाई” ही बालकविता कर्नाटक राज्यातील कर्नाटक टेक्स्ट बूक सोसायटी (केटीबीएस) ने २००७ मध्ये प्रकाशित झालेल्या “निवडक किशोर” ग्रंथातून घेऊन इयत्ता सातवीच्या अनिवार्य “माय मराठी” पाठ्यपुस्तकात २०१८ पासून पुढील दहा वर्षांसाठी समावेश केला आहे. सोबतच २०१५ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला वर्गाच्या “उपयोजित मराठी” विषय पुस्तकात सारांश लेखनासाठी “ग्रीष्म ऋतू” कविताचा समावेश केला आहे.
असंख्य मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
कवी आंधळेंच्या ३० वर्षांच्या काव्यलेखनाचे मासिक “किशोर” आणि परराज्यातील अभ्यासक्रम मंडळ, जळगाव विद्यापीठाने नकळत घेतलेली ही दखल उल्लेखनीय आहे. याबद्दल चाळीसगाव सेवा सहकारी शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष जी. जी. चव्हाण, चिटणीस राजेश राठोड, उपाध्यक्ष मच्छिंद्र राठोड, संचालक योगेश चव्हाण, चाळीसगाव मसापचे अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, उपाध्यक्ष गणेश आढाव, मसाप विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनील राजपूत, कार्यकारी विश्वस्त किसनराव जोर्वेकर, ज्येष्ठ बंधू कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्यासह अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, साहित्यिक मित्रांनी कवी मनोहर आंधळेंवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.