सोयगाव तालुक्यातील २१ गावांची निवड
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या टप्पा क्र. दोनसाठी सोयगाव तालुक्यातील २१ गावांची निवड केली आहे. बनोटी महसूल मंडळातील ४३ गावांना मात्र त्यातून वगळण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नानाजी देशमुख कृषी संजीवनी या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा टप्पा क्र. दोनसाठी राज्यातील विविध गावांची निवड केली होती. या योजनेसाठी सोयगाव तालुक्यातील जरंडी, माळेगाव, पिंपरी, कंकराळा, रावेरी, सोनासवाडी, गलवाडा, आमखेडा, वरखेडी (खु), पळसखेडा, धनवट, जंगलातांडा, फर्दापूर, चोंडेश्वर, वरखेडी (बु), ठाणा, मोलखेडा, राकसा, हिंगणा, जामठी अशा २१ गावांची निवड केली आहे. सोयगाव महसूल मंडळातील आमखेडा, गलवाडा, माळेगाव, पिंपरी, कंकराळा, सोनसवाडी सहा गावांनाही वगळण्यात आले आहे.
बनोटी महसूल मंडळातील ४३ गावांना मात्र या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बनोटी मंडळात आधीच खरीपाच्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असताना शासनाच्या योजनेतूनही वगळण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये गावस्तरीय समित्या गठित करणे क्रमप्राप्त आहे. परंतु कृषी आणि महसूल विभागाने अद्यापही यासाठी कोणतीही संयुक्त बैठक घेतली नाही. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
काय आहे पोखरा योजना
शेतकरी योजनेत बांधावर, गटात वृक्ष, फळबाग लागवड करू शकतात. शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, शेततळे, ठिबक, तुषार सिंचन, विहीर, विहीर पुनर्भरण, सिमेंट नाला, बांध आदी कामे करू शकतात. यासाठी शासन अनुदान देते.