रा.काँ.त कार्यकर्त्यांच्या प्रवेशाप्रसंगी आ.एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष हा छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारांवर चालणारा पक्ष आहे. संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचे जतन करणारा, समाजातील वंचित घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण यांचे हित जपणारा पक्ष आहे. अशा पक्षात सर्व जातीधर्म, गरजूंना न्याय आणि नेतृत्वाची संधी मिळते, असे प्रतिपादन माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी केले.
बोदवड तालुक्यातील कोल्हाडी, जामठी, करंजी गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ.एकनाथराव खडसे यांच्या हस्ते प्रवेश घेणाऱ्यांच्या गळ्यात पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी, नवतरूणांसह शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे. पक्षात अशा सर्वांचे स्वागत करते, असे रोहिणी खडसे म्हणाल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी (एस.पी.) गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.