साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत १ मे ते ३१ मे च्या दरम्यान तापमान सलग पाच दिवस ४५ डिग्रीपेक्षा जास्त असल्याने विमा कराराच्या निकषानुसार जिल्ह्यातील सर्व ८६ महसूल मंडळामधील विमाधारक केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकरी हा वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसह व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे त्याचा आर्थिक कणा पूर्णता मोडला गेलेला आहे. बहुतांश पीडित केळी उत्पादक शेतकऱ्यांना २०२२-२३ चा पिक विमा अजूनही मिळालेला नाही. यावर्षी जिल्ह्यात ५८ हजार ७३३ हेक्टरवर ५६ हजार ३६१ शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना कमी व उच्च तापमानाची नुकसान भरपाई म्हणजे १ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये तापमान सलग तीन दिवस आठ डिग्रीपेक्षा कमी असल्याने जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी २६ हजार ५०० नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान तापमान सलग पाच दिवस ४२ डिग्रीपेक्षा जास्त असल्याने जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे.
परंतु मे महिन्यात १ मे ते ३१ मे दरम्यान तापमान सलग पाच दिवस ४५ डिग्रीपेक्षा जास्त असल्याने विमा करारानुसार विमाधारक केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.