अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये – पालकमंत्री छगन भुजबळ

0
58

नाशिक – प्रतिनिधी  राज्यात अतिवृष्टीमुळे दुर्दैवी घटना घडत आहेत. दुर्दैवाने काही ठिकाणी अल्प पाऊस असून धरणसाठादेखील कमी आहे. तर काही भागात अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार असून, जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

 

नांदगाव मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील सभागृहात नांदगाव व मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर, पंचायत समिती सदस्य सुभाष कुटे, माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, सोपान कासार, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, दिपक पाटील यांच्यासह दोनही तालुक्यातील गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

 

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येत असून त्याच धर्तीवर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करुन त्यांना न्याय देण्याचे काम होईल असा विश्वास व्यक्त करतांना मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महसूल, कृषी, आरोग्य व नगरपरिषदेने पूर्ण ताकदीने काम करुन बाधितांच्या पुर्नवसनाचे काम तातडीने करावे. शेतशिवारासह पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाप्रती संवेदनशील राहून प्रशासनातील प्रत्येक घटकाने त्याला न्याय देण्याबरोबर त्याच्या पुर्नवसनाची जबाबदारी यथोचितरित्या पार पाडावी. झालेल्या नुकसानीचे पंचनामे व तातडीच्या मदतीसह नुकसान झालेल्या बंधारे व रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

शहरातील गाळ व चिखलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी शहराची साफसफाई तातडीने करण्यात यावी. यासाठी फायर ब्रिगेडची लागणारी यंत्रणा तातडीने मागवून शहरातील सर्व चिखल साफ करण्यात यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुरूस्तीचे कामे तातडीने हाती घ्यावी, तर खंडीत झालेला विज पुरवठा विज वितरण कंपनीने तात्काळ सुरळीत करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here