साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रभर दुर्गसंवर्धन कार्यात अग्रेसर सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत महाराष्ट्रभरातील जवळपास १०० पेक्षा अधिक किल्ल्यांवर दसऱ्यानिमित्त तोरणे पताका बांधून गडाचे पूजन करण्यात आले. याच उपक्रमातंर्गत चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून तोरणे, पताका बांधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढत भंडाऱ्याची उधळण करुन गडाचे पूजन करण्यात आले.
मल्हार गडावरील गडदेवता खंडोबाची आरती आणि तळी भरून संबळ पिपाणीच्या तालावर ठेका धरणाऱ्या दुर्गसेवक, दुर्गसेविकांच्या उपस्थितीत सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत राबविला जाणारा मल्हारगड दसरा महोत्सव यंदा सातव्यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला. चाळीसगाव तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक, दुर्गसेविका तसेच चाळीसगाव सायकल असोसिएशन, स्विमिंग असोसिएशनचे असंख्य सदस्य उपस्थित होते.