साईमत, धुळे : प्रतिनिधी
शिरपूरच्या भूसंपादन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ.अमरीश पटेल यांनी अचानकपणे कार्यालयाला भेट दिली. येथे जावून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तंबी दिली.
शिरपूरचे आ.अमरीश पटेल यांच्याकडे भूसंपादन विभागाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. यात प्रामुख्याने भूसंपादन कार्यालयातील कर्मचारी नियमित कार्यालयात उपस्थित राहत नाही. तसेच चुकीच्या नोंदी करून नागरिकांना नाहक त्रास देणे व या कार्यालयात एजंटगिरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याच्या तक्रारी वारंवार आ.अमरीश पटेल यांना प्राप्त झालेल्या होत्या.
आ.अमरीश पटेल यांनी कार्यालयास भेट दिली. आ.पटेल यांनी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना तक्रारींसंदर्भात खडेबोल सुनावले. शिवाय यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित विभागाच्या मंत्र्यांना याबाबत कळविण्यात इशारा यावेळी आ. अमरीश पटेल यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.