मुंबई ः प्रतिनिधी
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार जोरदार टीकास्र सोडले आहे. देशातील महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत.या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून दंगली पेटवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान, त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा आरोप केला.
यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनीही त्यांच्या काळात केला नसेल.काल गुजरातच्या मंत्रालयात नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपाचा मित्र असलेल्या उद्योगपतीला ३७०० कोटींचा फायदा मिळवून दिला आहे. शक्तिसिंह गोयल यांनी बाहेर काढलेले हे प्रकरण गंभीर आहे.अशी रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. दररोज भ्रष्टाचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. केंद्रातील प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे.
“देशात महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत.या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी त्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे दंगली पेटवायच्या. लव्ह जिहाद सारखे नसलेले मुद्दे चर्चेत आणायचे. मोर्चे काढायचे. हे कितीही केले तरी २०२४ साली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत येणार नाही, अशी गॅरंटी ‘इंडिया’ आघाडीतर्फे आम्ही देत आहोत,” असेही संजय राऊतांनी सांगितले.