मलकापूर : प्रतिनिधी
धाड येथील जिल्हा परिषदेच्या हायस्कूलला २०१३-१६ मध्ये खोटी व बनावटी माहिती देऊन दोन वेळा रजा प्रवास सवलतीचा लाभ घेऊन संगनमताने शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भ्रष्ट शिक्षकांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग विषयक व फौजदारी कार्यवाही करावी, अन्यथा १५ ऑगस्टपासून बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर लक्ष्मण इंगळे (रा. बेलाड) यांनी निवेदन दिले होते.
प्रभाकर इंगळे यांनी दिलेल्या निवेदन आणि दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात आली. या दरम्यान जि.प. हायस्कूल धाड येथील २०१३-२०१६ मध्ये खोटी व बनावटी माहिती घेऊन दोन वेळा रजा प्रवास सवलतीच्या लाभाबाबत मूळ तक्रारी अनुषंगाने चौकशी अहवाल प्राप्त झालेला आहे. चौकशी अहवालाच्या अनुषंगाने दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर १५ दिवसात शिस्तभंग व फौजदारी विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत असल्याचे लेखी पत्र प्रभाकर इंगळे यांना दिले आहे. त्यामुळे त्यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे.