साईमत, प्रतिनिधी, जळगाव
प्रशासन, लोकप्रतिनिधी, आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित प्रयत्न केल्यास समस्या मुक्त होऊन सुंदर, सक्षम, स्मार्ट शहर होऊ शकते. यातून शहराचा विकासही होईल, असे भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश जैन यांनी सांगितले.
भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे प्रभात चौफुली, अग्रवाल चौक,गुजराल पेट्रोल पंप व दादावाडी येथे हायवे अंडरपासमध्ये लावण्यात आलेल्या आठ कॉन्व्हेक्स मिररच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापौर जयश्री महाजन, भाविपचे क्षेत्रीय सचिव गिरीश दोशी, प्रांताध्यक्ष विश्वास लातूरकर, माजी महापौर सीमा भोळे, किरण बच्छाव, यझदी पाजनीगारा, यश मंत्री श्रीराम पाटील, जळगाव शाखेचे अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना महामंत्री जैन यांनी सेवा आणि संस्कार याबरोबर भारत विकास परिषदेची विकासात योगदान देण्याची भूमिका आहे, असे सांगून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेमिया मुक्तीसाठी रुग्णवाहिका जळगाव शाखेला देणार असल्याची माहिती दिली. तसेच जळगावात स्पर्धा परीक्षांसाठी केंद्र सुरू करण्याचा स्थानिक शाखेने प्रयत्न करावा, असे आवाहन देखील केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उड्डाणपुलाखाली ज्या ठिकाणी धोकादायक जागा किंवा वळण असते त्यासाठी हे कॉन्व्हेक्स मिरर अत्यंत उपयुक्त आहे. भारत विकास परिषदेच्या या उपक्रमामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापौर जयश्री महाजन, किरण बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक महेश जडिये यांनी तर सूत्रसंचालन श्याम दायमा यांनी केले. आभार उमेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमास परिवहन विभागाचे अधिकारी सचिन राठोड, भारत विकास परिषदेचे क्षेत्रीय सचिव अनिरुद्ध तोडकर, क्षेत्रीय संपर्क सचिव तुषार तोतला, प्रांत सचिव अमित कुलकर्णी, रा.स्व. संघाचे महानगर संघचालक उज्ज्वल चौधरी, नगरसेवक अनंत जोशी, माजी प्रांताध्यक्ष रवींद्र लढ्ढा, माजी प्रांत सचिव योगेश मांडे, प्रांत संघटन मंत्री अरुण जोशी, प्रांत ग्रामविकास मंत्री प्रसन्न मांडे, संस्कार विभागाच्या प्रांत उपाध्यक्ष राधिका नारखेडे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.