साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर
येथील ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आजपर्यंत आमरण उपोषण सुरूच आहे. शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच वरूणराजा बरसत आहे. पावसाची कुठलीही पर्वा न करता प्रमोद पाटील हे आमरण उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार नाही आणि भ्रष्टाचार जनतेसमोर आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे प्रमोद पाटील यांनी जाहीर केले आहे.
गेल्या तीन महिन्यापासून साकेगाव ग्रामपंचायतीत प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांनी जल जीवन मिशन नळ जोडणी तसेच दलित वस्ती सुधारणा लाईट तसेच गटारी यांच्यामध्ये पंधरा लाख ते वीस लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रमोद पाटील यांनी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच भुसावळच्या वाढीव भागात साकेगाव शिवारातील सायंकाळच्या वेळेस प्रभारी सरपंच आनंद ठाकरे आणि ग्रामपंचायतीचा एक कर्मचारी तिथे शिक्के मारून ३ हजार ३०० प्रमाणे अशा अनेक पावत्या फाडून ग्रामपंचायतीला भरणा केला नाही. पैसे ग्रामपंचायतीला न भरता परस्पर हडप केले असल्याचा आरोपही केला आहे. त्यांच्यावर व त्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल होत नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होऊन चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे प्रमोद पाटील यांनी जाहीर केलेले आहे.
जि.प., पं.स.च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
मला दोन मुली आहेत. पत्नी आहे. मी त्यांना घरी एकटा सोडून मी माझ्या घरावर तुळशीपत्र ठेवून भ्रष्टाचार उघडकीस करण्यासाठी व ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी चार दिवसापासून उपोषणाला बसलो आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकारी चौकशीकडेे दुर्लक्ष करत आहे. सत्ताधारी आपल्या सत्तेचा गैरवापर करून माझी ग्रामपंचायतीच्या ओट्यावर समाधी व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून ते या उपोषणाकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले.