तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला

0
31

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील वरखेडे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असलेल्या तामसवाडी गावाचा पुनर्वसन प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर याप्रश्नी आ.मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत तामसवाडी गावासाठी मालेगाव रस्त्यालगत पिलखोड गावाच्या अलीकडे जागा निश्चित करून दिल्याने मोठ्या प्रतिक्षेनंतर तामसवाडी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तामसवाडी गावाचे मुख्य रस्त्यालगतच पुनर्वसन होणार असल्याने तामसवाडी ग्रामस्थांनी आ.मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत. अखेर तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला आहे.

सध्या पूर्णत्वास आलेल्या वरखेडे धरणाच्या बुडीत क्षेत्रात तामसवाडी गाव येत आहे. गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाच्यावतीने देण्यात येणारी शासकीय जमीन तामसवाडी ग्रामस्थांना मान्य नसल्याने त्यांनी गावासाठी पिलखोड व टाकळी प्रदेच्यामध्ये मालेगाव रस्त्यालगत असणारी खासगी जमीन संपादित करून द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, याला संबंधित शेती मालकांनी असहमती दर्शविल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. याबाबत मार्ग काढण्यासाठी आ.मंगेश चव्हाण यांनी ८ ऑगस्ट रोजी तामसवाडी येथील सरपंच, सदस्य, तामसवाडी पुनर्वसन समितीचे सदस्य आणि संबंधित शेतकऱ्यांसह महसूल, जलसंपदा, भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आपल्या जनसेवा कार्यालयात बोलावली होती. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे, वरखेडे लोंढे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले, प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, उपअभियंता कामेश पाटील, तालुका भूमि अभिलेख, कार्यालयाचे देवेंद्र राजपूत, भाजपाचे तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, तामसवाडी सरपंच शिवदास धोंडू पाटील, उपसरपंच अनिता नाना दळवी, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील, नितीन पाटील, विठोबा पाटील, वरखडे लोंढे बॅरेज तामसवाडी पुनर्वसन अध्यक्ष सचिन पाटील व तामसवाडी गावाचे पोलीस पाटील किरण दळवी, धनराज पाटील, कारभारी सोनवणे, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.

बैठकीत दोन्ही बाजूंकडून सहमती न झाल्याने आ.मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत सध्या नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत पिलखोड गावाचे सुपुत्र अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधून याच जागेच्या बाजूला असलेली त्यांची शेतजमीन तामसवाडी गावासाठी देण्याची विनंती केली. एका पूर्ण गावाचा पुनर्वसन प्रश्न मार्गी लागत असल्याने व त्यासाठी आ. मंगेश चव्हाण हे विनंती करत असल्याने अनिल पाटील यांनी आपला होकार कळविला. योगायोगाने तेदेखील गावी आले असल्याने त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांना अधिकारी व शेतकरी यांच्यासह मागणी असलेली शेतजमीन पाहणीसाठी येण्याची विनंती केली.

मोठेपणा दाखविल्याबद्दल आ.चव्हाण यांचे मानले आभार
चाळीसगाव-मालेगाव रस्त्यालगत टाकळी प्रदे गावाच्या पुढे मन्याड ५ नंबर चारी जवळ असलेले पीआय अनिल पाटील यांच्या शेताच्या पाहणीसाठी आ.मंगेश चव्हाण तात्काळ अधिकारी वर्ग व तामसवाडी ग्रामस्थ यांच्यासोबत दाखल झाले. याठिकाणी अनिल पाटील यांची २७ एकर जमीन आहे. जागेची सामूहिक पाहणी केल्यानंतर ही जागा गावाच्या पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे सर्वांनी आपले मत व्यक्त केले. अतिशय मोठ्या मनाने आपल्या पिलखोड गावाजवळील तामसवाडी गावाला जागा देण्याचा मोठेपणा दाखविल्याबद्दल आ.मंगेश चव्हाण यांनी अनिल पाटील यांचे आभार मानले.

ग्रामस्थांची सभा घेत जागेविषयी मते जाणून घेतली
प्राथमिक दृष्ट्या गावाच्या पुनर्वसनासाठी जागेची सहमती झाल्यानंतर आ.मंगेश चव्हाण यांनी लगेच तामसवाडी गावात जाऊन सर्व ग्रामस्थांची सभा घेत त्यांची जागेविषयीची मते जाणून घेतली. यावेळी सर्व तामसवाडी ग्रामस्थांनी जागेला सहमती दर्शविली. गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आ.मंगेश चव्हाण यांच्यामुळे मार्गी लागत असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. “दादा आमना गावना विषय तुम्हीच मार्गी लावश्यात हाई आमले माहिती होत” अश्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया तामसवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. महाविकास आघाडी सरकारने खोडा घातलेले वरखेडे बंदिस्त पाईप कालवा प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार असल्याचा विश्वास आ.मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.

तालुकावासीयांचे स्वप्न साकार होणार
पिलखोडचे सुपुत्र अनिल पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने तामसवाडी गावाच्या पुनर्वसन विषयाला दिशा मिळाली आहे. पुढील काळात यातील तांत्रिक बाबी तपासून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न मी वैयक्तिक लक्ष घालून करणार आहे. तश्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या आहे. राज्यात मॉडेल ठरेल असे हे पुनर्वसन करण्याचा माझा प्रयत्न राहील. तामसवाडी गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर वरखेडे धरणाचे पाणी १०० टक्के अडविले जाणार आहे. यासोबतच महाविकास आघाडी काळात बंदिस्त पाईपलाईन प्रस्ताव तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाकारल्याने हा प्रकल्प रखडला होता. भाजपा महायुतीचे सरकार आल्यानंतर त्याला पुन्हा मान्यता मिळवून आणली आहे. त्याचाही आराखडा मंजूर झाला आहे. लवकरच यासाठी निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. १९९९ पासूनचे वरखेडे धरणाच्या पाण्याचे तालुकावासीयांचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया आ.मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here