मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईत रविवारी रंगशारदा सभागृहात शिवसेना(ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस आता ‘मस्टर मंत्री’च राहणार की काय? ते फक्त कोण आला, याची नोंद ठेवणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावे लागले, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.“ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपामध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले.आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचे भूमीपूजन झाले तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारने राज्यभर गुन्हे दाखल केले होते, हे तुम्ही विसरलात की काय?” असा सवाल चंद्रशेखवर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
“औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला तसाच सुरूंग जनतेने तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढेच काम दिलेय,” अशी टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.