जळगावच्या खासदारांचा ‘ उन्मेष पॅटर्न ‘ राज्यसरकार राज्यभर राबवणार

0
46

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

राज्यात आदर्श ठरावा असा शासकीय जत्रेचा उपक्रम खासदार उन्मेष पाटील यांनी ते चाळीसगावचे आमदार असताना राबविला होता. ज्यात एकाच छताखाली सर्व शासकीय यंत्रणा आणून विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी हजारो नागरिकांना मिळवून दिला होता. त्यावेळी ‘उन्मेष पॅटर्न’ म्हणून ओळखल्या गेलेला हा उपक्रम आता राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

चाळीसगाव (Jalgaon) येथे खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात २७ ते २९ ऑगस्ट २०१९ असा तीन दिवस शासकीय योजनांची  जत्रा हा उपक्रम राबवला होता. ज्यात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी वंचित असलेल्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला होता.

सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून लाखो लोकांना लाभ देण्याची किमया उन्मेष पाटील यांनी त्यावेळी साध्य केली होती. शेकडो स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आल्याने शासनाच्या जवळपास सर्वच योजनांची माहिती देखील यानिमित्ताने नागरिकांपर्यंत पोचली होती. या शासकीय जत्रेसाठी आलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांसाठी देखील हा उपक्रम प्रेरणादायी ठरला होता. ज्याची चर्चा केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात झाली होती. आता हाच ‘उन्मेष पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शासनाने केली चर्चा

खासदार उन्मेष पाटील यांनी नेमके कसे आयोजन केले होते, त्यासाठी यंत्रणा कशी राबवावी लागली, त्यासाठी कशा बैठका घेतल्या अशी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांना मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास मुंबईत आमंत्रित केले होते. त्या अनुषंगाने उन्मेष पाटील यांनी ‘शासकीय योजनांची जत्रा’ या संकल्पनेची पूर्ण माहिती वजा विस्तृत अहवाल सादर केला होता.

‘शासकीय योजनांची जत्रा’ राबवण्यासाठी सुरवात कशी करावी यापासून ते नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ नेमका कसा दिला जाईल, याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून जाणून घेतली.

त्यानंतर शासनाने देखील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा ‘उन्मेष पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नियोजन देखील सुरु झाले असून लवकरच राज्यात सर्वत्र चाळीसगावला भरवली होती, अशी ‘शासकीय योजनांची जत्रा’ भरवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल.

मुखमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘शासकीय योजनांची जत्रा’ राबवण्यासाठी अगदी पॉम्पलेटपासून बॅनर्स, लाभार्थ्यांना केले जाणारे आवाहन, घरपोच दिलेले पत्र, अधिकाऱ्यांचा समन्वय आढावा, प्रत्यक्ष तयारीपासून ते अगदी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यापासूनची सर्व माहिती दिली. त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यात अशी जत्रा भरवून किमान ७५ हजार नागरिकांना योजनांचा लाभ एका छताखाली देण्याचा निर्णय मंत्रिमहोदयांनी घेतला. आपला ‘जत्रा पॅटर्न’ त्यांनी स्वीकारल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

– उन्मेष पाटील, खासदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here