जळगाव ः प्रतिनिधी
शाळेची घंटा वाजली असून मुले दफ्तर घेऊन वर्गातही पोहचली आहेत मात्र पहिली ते आठवीच्या विद्यार्थांच्या हातात अद्याप बालभारतीची पुस्तके पडलेली नसल्याने त्यांची चिंता वाढली. राज्य बालभारती विभागाकडून यंदा कमी प्रणात झालेल्या छपाईमुळे पुस्तके आली नसल्याने विक्रेत्यांकडून ती पुढील दहा दिवसात मिळतील, असे सांगितले जाते आहे.
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत वितरणासाठी पुस्तकांची छपाई केली जाते. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या 3000 शाळांतील पहिली ते आठवीचे सुमारे 4 लाख विद्यार्थी या पुस्तकांच्या प्रतिक्षेत आहेत.
पाठपुरावा सुरु
बालभारतीच्या पुस्तकांसाठी पाठपुरावा बालभारतीच्या इतिहास, हिंदीसह अन्य काही विषयांची पुस्तके मिळत नाहीत. या आधी नाशिक डेपोकडून पुस्तके यायची. आता ती औरंगाबादहून येतात. आमचा पाठपुरावा सुरु आहे.
– जितेंद्र वाणी, विद्याधन बुक डेपो
ओझे कमी करण्याचा प्रयत्न
गेल्या वर्षाच्या मागणीवरून पुस्तकांची छपाई झाली असावी. ही मागणी शाळानिहाय पुन्हा मागवण्यात आली. एकात्मक व द्विभाषिक अभ्यासक्रमातून पुस्तकाची संख्या व ओझे कमी करण्याचा प्रयत्न आहे. पुस्तकांची छपाई सुरु असून पुढील आठ दिवसात ती बाजारात उपलब्ध होतील, असे बालभारतीचे मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.