जळगाव ः प्रतिनिधी
भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून देशभरात तणाव निर्माण झाला आहे. याबाबत कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल करणे, स्टेटस ठेवणाऱ्यांवर पोलिस सुमोटो कारवाई करून गुन्हा दाखल करणार आहेत. पोलिस ठाणे, सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याचे लोक गोळा करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
नूपुर शर्मा यांच्या संदर्भात पोस्ट करणाऱ्यांवर संबंधित पोलिस ठाण्यात तीन गुन्हे आत्तापर्यंत दाखल झाले आहेत. तर यावल पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव आणल्याप्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन जमावावर एक गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना गर्दी करणाऱ्यांवर नजर आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रार, फिर्यादीवर पोलिस कार्यवाही करीत आहे, त्यासाठी कोणत्याही समुदायाने दबाव आणण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी करू नये.
फिर्याद देण्यासाठी पाचपेक्षा जास्त लोकांनी पोलिस ठाण्यात येऊ नये.आंदोलन करायचे असल्यास पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियात गैरप्रकार आढळून आल्यास थेट पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहनही डॉ. मुंढे यांनी केले.