जळगाव : प्रतिनिधी
शहरातील गेंदालाल मिल परिसरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी करीत एकमेकांना चाकूने वार करत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी बुधवार १ जून रोजी दुपारी परस्परविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, पहिल्या फिर्यादीत शेख तनविर शेख रहिम यांनी म्हटले आहे की, गेंदालाल मिल परिसरातून भावाच्या दुचाकीवरून शेख तनविर हा बुधवार १ जून रोजीच्या रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घरी येत असतांना सरला सुरेश बर्वे या महिलेला दुचाकीचा धक्का लागला. या कारणावरून आकाश सुरेश बर्वे आणि गोलू सुरेश बर्वे दोन्ही रा. रेणुका माता मंदीर गेंदालाल मिल यांनी शिवीगाळ करून मारहाण केली तर एकाने शेख तनविर याच्या मांडीवर आणि पायांवर चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी आकाश सुरेश बर्वे आणि गोलू सुरेश बर्वे दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या फिर्यादीत आकाश सुरेश बर्वे याने म्हटले आहे की, गेंदालाल मिल परिसरातील रेणूका माता मंदीर बुधवार १ जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजता घरी असतांना शेख तनवीर याच्यासह इतर अनोळखी दोन जण घरात घुसून मारहाण व शिवीगाळ करून दामदाटी केली. व तनविरच्या हातातीच चाकूने गुडघ्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी आकाश बर्वे याच्या फिर्यादीवरून शेख तनविर याच्यासह इतर दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.
