जळगाव : वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे अनेक आकडे बहाद्दर बिनदिक्कतपणे विजेची चोरी करतात, त्यांच्या वाढीव भारामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे. या आकडेबहाद्दरांवर कारवाईसाठी महावितरण जळगाव परिमंडलाने धडक मोहीम हाती घेतली असून, एका दिवसात हजारो आकडे काढून त्यांच्या केबल व मोटारी जप्त करण्याचे काम केले आहे. या प्रयत्नांमुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन् आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे. तसेच ही धडक मोहीम अशीच सुरु राहणार आहे.
तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून महावितरणची मागणी 24500 मेगावॅटच्या पुढे गेली आहे. तसेच ही मागणी टिकून आहे. उलट यात वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महाराष्ट्र शासन व महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र ही परिस्थिती सबंध देशात असल्याने वीज मिळणेही अवघड झाले आहे. खुल्या बाजारात विजेचे दर 12 रुपयांपर्यंत आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.
आकडे बहाद्दरांवर कारवाई करताना ज्या 11 केव्ही वीज वाहिन्यांचा करंट 100 म्पीअरच्या पुढे आहे अशा वाहिन्यांवर गुरुवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये अनधिकृतपणे जोडलेले कृषिपंप, त्याचे केबल, स्टार्टर आदी जप्त केले जात आहे. घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा काढले जात आहेत. मोहीमेपूर्वी व मोहीमेनंतर किती भार कमी झाला याचा लेखाजोखा कर्मचाऱ्यांना विचारला जाणार आहे. या कामात वरिष्ठ अभियंत्यापासून जनमित्र, ऑपरेटर, कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुरुवारी एकाच दिवसात जळगाव जिल्ह्यात 381, धुळे जिल्ह्यात 376 तर नंदुरबार जिल्ह्यात 195 आकडे काढण्यात आले.
