जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील विवाहित महिलेला माहेरून साडेतीन लाख रुपये आणावे या मागणीसाठी पतीसह सासरकडील मंडळींकडून छळ होत असल्याने पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या श्रद्धा तुषार हिप्पर (वय-२३) यांचा विवाह २०१९ मध्ये मनमाड येथील तुषार ज्ञानेश्वर हिप्पर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती तुषार हिप्पर याने माहेरहून साडेतीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आनल्यामुळे तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता या माहेरी रामेश्वर कॉलनी जळगाव येथील निघून आल्या. बुधवार १६ एप्रिल रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती तुषार ज्ञानेश्वर हिप्पर, मंगलाबाई ज्ञानेश्वर हिप्पर, ज्ञानेश्वर आनंदा हिप्पर आणि अक्षय ज्ञानेश्वर हिप्पर सर्व रा. मनमाड यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.
