नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्तारुढ एनडीए व विरोधी आघाडी बहुमताच्या अगदी समीप आहे.विरोधी पक्षही स्वतःला मजबूत म्हणवून घेत आहेत,पण दोघांकडे पुरेसे बहुमत नाही.अशा परिस्थितीत जगनमोहन रेड्डी,नवीन पटनायक आणि केसीआर यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. त्यांच्याशिवाय यूपीए आणि एनडीएचा मार्ग सोपा होणार नाही. छोट्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
एनडीए बहुमतापासून 13 हजार मतांनी दूर आहे.रेड्डी किंवा पटनायक यापैकी एकाचा पाठिंबा असेल तर विजय निश्चित होईल. 2017 मध्ये या दोघांनी एनडीएला पाठिंबा दिला होता. आता 5 वर्षांनंतर 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीचे चित्र असे असू शकते.सर्वप्रथम,ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याबद्दल जाणून घेऊ या… विरोधी पक्षाच्या वतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नवीन पटनायक यांना निमंत्रण दिले आहे. दुसरीकडे भाजपनेही बडे नेते अश्विनी वैष्णव यांना पटनायक यांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी दिली आहे.2012, 2017 प्रमाणेच 2022च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही नवीन पटनायक यांची मागणी वाढली आहे.त्यांच्याकडे 30 हजारांहून अधिक मूल्याची मते आहेत.
केंद्राच्या राजकारणात फारसे सक्रिय नाही
केंद्रीय पातळीवर पटनायक यांचा पक्ष बिजू जनता दल अखेरच्या वेळी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये सहभागी होता. तेव्हापासून केंद्रातील कोणत्याही सरकारमध्ये सहभागी नाही. म्हणजेच जवळपास 20 वर्षे पटनायक यांची मध्यवर्ती राजकारणात फारशी भूमिका नसली,तरी ते निकाल फिरवू शकतात.
रेड्डी यांची साथही निर्णायक
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला 40 हजारांहून अधिक मूल्याची मते आहेत.एनडीएचे सर्वोच्च नेते जगनमोहन रेड्डी यांच्या संपर्कात आहेत. रेड्डी यांचा पाठिंबा एनडीएला मिळू शकतो मात्र, अद्यापपर्यंत त्यांची अधिकृत घोषणा रेड्डी यांनी केलेली नाही.
टीआरएसने अद्याप पत्ते उघडले नाहीत
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी अद्याप त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत मात्र, तेलंगणा दौऱ्यावर गृहमंत्री ज्या पद्धतीने टीआरएस सरकारवर हल्लाबोल करत आहेत, त्यावरून भाजपचा मार्ग छोट्या पक्षांमध्ये टीआरएसला सोबत घेऊन चालण्याच्या मार्गापेक्षा वेगळा असल्याचे दिसून येत आहे. रेड्डी आणि पटनायक यांच्यासोबतच विजयाचे अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.