अक्षय डोंगरे यांचे सादरीकरण : शिवदर्शन सप्ताहात गुंफले द्वितीय पुष्प
भुसावळ – ‘मारूनी डफावर थाप शाहीर गाती पोवाडा’ असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून तर त्यांच्या चरित्रातील विविध प्रसंगाचे वर्णन आपल्या खास शैलीत काव्यरचनेद्वारे सादरीकरण करून युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे (नगर) यांनी पोवाड्यातून शिवरायांची महती गायन केली. वीररसाबरोबरच करूण आणि शांतरसाचा समावेश करत आपल्या खड्या आवाजात गायलेल्या पोवाड्याने त्यांनी श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणले.
भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित शिवजयंतीनिमित्त शिवदर्शन सप्ताहात दुसरे पुष्प युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे यांनी गुंफले. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना डॉ. जगदीश पाटील यांची आहे. दुसऱ्या दिवशी ‘शाहिरी पोवाडा’ या विषयावर आधारित अक्षय डोंगरे यांनी महाराष्ट्राच्या मातीचा धगधगता इतिहास आपल्या वाणीद्वारे सादर केला. प्रारंभी त्यांचा परिचय प्रमोद आठवले यांनी करून दिला. पोवाडा सादरीकरणाची सुरूवात ‘शिवरायांचे गातो गुणगान’ या पोवाड्याद्वारे करण्यात आले. त्यानंतर गद्यपद्यमिश्रित असलेला पोवाडा सादर करताना अधूनमधून त्यांनी शिवचरित्राचा आढावा घेतला. त्यात ते म्हणाले की, मन, मेंदू, मनगट व पाठीचा कणा ताठ करून पोवाडा ऐकावा लागतो. तेव्हाच पोवाड्यात एकरस होता येते. शिवचरित्र बालमनावर रूजावे यासाठी पोवाडा हे माध्यम निवडले आहे. पोवाडा हा वीररसातील लेखन आणि गायनाचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे हे स्फूर्तिदायी आहेत. पोवाडे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. वीर पुरूषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय. इतिहासाचे साधन म्हणूनही पोवाड्याला विशेष महत्त्व आहे. शिवचरित्र अधिक प्रखरपणे पोवाड्यातून मांडले जाते, असेही ते म्हणाले. त्यांनी ‘शिवरायांचे गातो गुणगान’, ‘शिवजन्माचा पोवाडा’ व ‘हिंदवी स्वराज्याची शपथ’ असे तीन पोवाडे सादर केले. डोईवर पटका, चुस्त पायजमा, सलवार, त्यावर पायघोळ झगा आणि हातात डफ घेऊन शिवरायांच्या शौर्याची तसेच त्यांच्या विविध गुणांची स्तुती युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे यांनी सादर केली. त्यांचे रूबाबदार व्यक्तिमत्त्व, खडा आवाज, शब्दांची उत्तम जाण आणि प्रसंगाचे प्रभावी सादरीकरण या कौशल्यामुळे त्यांचे उत्कृष्ट सादरीकरण झाले. त्यांना हभप ईश्वर महाराज वाघमारे आखातवाडा, संदेश गाडेकर शिरूर, केशव डांगरे यांची साथ संगत लाभली. सूत्रसंचालन मनीषा ताडेकर यांनी तर आभार डि.के. पाटील यांनी मानले.