जामनेर/ चोपडा/ भुसावळ ः साईमत चमूकडून
मुंबईहून आलेले रावेर लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख विलास पारकर व जामनेर विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांनी पारकर यांना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे रक्ताच्या शाईचे पत्र सुपुर्द केले.दरम्यान त्यांनी भुसावळ ,चोपडा व शेंदुर्णी येथेही बैठका घेऊन शिवसैनिकांना जनतेला सत्य परिस्थिती सांगून,नवे कार्यकर्ते जोडून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
जामनेर येथे तालुका विधानसभा क्षेत्राची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, जामनेर विधानसभा संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील उपस्थित होते. या वेळी जामनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या रक्ताच्या शाईने पत्र लिहून पाठिंबा दर्शवला. या पत्रावर युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख विश्वजित पाटील, युवासेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख ॲड.भरत पवार, शेंदुर्णी शहर प्रमुख संजय सूर्यवंशी, विशाल लामखेडे, राहुल कुमावत, योगेश वंजारी, मुकेश जाधव, संजय देठे, युवराज पाटील, कृष्णा गुरव, मयूर परदेशी, मोहन जोशी, नीळकंठ पाटील, तुकाराम गोपाळ, जीवन परदेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
भाजप मुंडे, तावडेंना झाली नाही, तेथे…
भाजप हा पक्ष पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना झाला नाही. तेथे शिवसेनेतील बंडखोरांची डाळ कशी शिजेल? याचे संबंधितांनी आत्मपरीक्षण करावे. या बंडखोरीमागे अर्थकारण असल्याचा आरोप जळगाव येथील गजानन मालपुरे यांनी केला आहे.
भाजपची संगत कशी?
चौपडा ः एकनाथ शिंदे यांचे बंड मुंबईकरांना क्षुल्लक वाटते परंतु ते ग्रामीण भागातील लोकांना मोठे वाटते. यापूर्वीही अनेक बंड शिवसेनेने थंड केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर विश्वास टाकला आणि त्यांनी विश्वासघात केला. सत्य परिस्थिती काय आहे, ती ग्रामीण भागात पोहोचवा, अशा सूचना रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी काल चोपडा येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत चोपडा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
या वेळी रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, माजी जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे, उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील,महिला जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील, दीपक चौधरी, तालुका संघटक सुकलाल कोळी, युवासेनेचे तालुकाप्रमुख गोपाळ चौधरी, पालिकेचे विरोधी गटनेते महेंद्र धनगर, माजी नगरसेवक किशोर चौधरी, प्रकाश राजपूत, सुनील बरडिया, जगदीश मराठे, सागर ओतारी, डॉ. रोहन पाटील, दिव्यांक सावंत, नरेंद्र बाविस्कर, धीरज गुजराथी, हरीश पवार, प्रदीप बारी, नितीन चौधरी, वासुदेव महाजन, प्रवीण लोहार, गुलाब ठाकरे, मंगेश पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.
विलास पारकर पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या आताच्या बंडापेक्षा पूर्वीचे छगन भुजबळ यांचे बंड मोठे होते कारण ते तेव्हा ओबीसींचे मोठे नेते होते. तेव्हा त्यांच्या घरावर हल्ला झाला होता, त्यात मी सहभागी होतो. भुजबळ ज्या 13 जणांना सोबत घेऊन गेले पुढे त्यातील केवळ भुजबळ निवडून आलेत. हे फक्त शिवसैनिकांमुळे शक्य झाले. त्यानंतर नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले. आज राणे व ठाकरे एका आमदाराला मोहताज आहेत. हिंदुत्वाच्या गप्पा करणाऱ्यांना हिंदुत्व कुणी शिकवले. यांच्या मागे ईडी लागली आहे तर यांचे नियोजन बंडखोरांनी आधीच करायला हवे होते, असेही पारकर या वेळी म्हणाले. तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.
मग त्यांच्यासोबत जायचे कसे?
भुसावळ – राज्यात महाआघाडीचा प्रयोग हे भाजपचे पाप आहे. त्यांनीच दिलेला शब्द पाळला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पाडण्यासाठी भाजपने अपक्ष उमेदवार दिला होता, मग त्यांच्यासोबत कसे जायचे? पक्षाने सर्व आमदारांच्या एकमतानेच राष्ट्रवादी व काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकारचा निर्णय घेतला होता. तरीही आता बंडखोरी झाली. मात्र, असे प्रसंग शिवसेनेसाठी नवीन नाहीत कारण शिवसेना हा पक्ष निष्ठावान शिवसैनिकांवर चालतो, असे रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी सांगितले. शहरातील ब्राह्मण संघात शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते.
मरेपर्यंत सोडणार नाही साथ
शिवसैनिकांनी रक्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमच्या नसा-नसात पोहोचलेल्या रक्ताच्या थेंबातून शिवसेनाप्रमुखांचे विचार जिवंत आहेत. आम्ही खिंड लढवण्यास सज्ज आहोत. तोफेचे बार ऐकल्याशिवाय हटणार नाही अन् मरेपर्यंत साथ सोडणार नाही.