जळगाव ः प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भात तक्रारी वाढल्या आहेत. मेहरुण परिसरात सोमवारी झालेल्या पाणीपुरवठा दरम्यान नागरिकांच्या घरात अशुद्ध व पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा झाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाणी साठवलेल्या भांड्याच्या तळाशी गाळ आणि हिरव्या रंगाचे शेवाळ जमा झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये मेहरूणमधील मराठी शाळा परिसरात सोमवारी सकाळी पाणीपुरवठा करण्यात आला होता. आधीच दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याची तयारी केली परंतु सुरुवातीला बराच वेळ पिवळ्या रंगाचे पाणी आल्याने भरण्यात आले नव्हते. त्यानंतर नागरिकांनी पाण्याचा साठा केला पण दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाणी साठवलेल्या भांड्यांची पाहणी केली असता बऱ्याच घरांमध्ये भांड्याच्या तळाशी गाळ व हिरव्या रंगाचे शेवाळ जमा झाल्याचे राष्ट्रवादीचे साजिद पटेल यांनी सांगितले.
यासंदर्भात प्रभागातील नगरसेवकांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत पटेल यांनी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने किमान शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा तसेच परिसरातील गळती दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, ज्या भागात जलवाहिनीचे काम सुरू आहे, त्या भागात दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.