पुणे : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात काश्मीर फाईल चित्रपट गाजू लागलाय. त्यावर दोन्ही बाजुने चर्चा आणि वाद सुरू झालेत. काहींचं म्हणणं आहे की या चित्रपटात अर्धवट इतिहास दाखवलाय. फक्त एक बाजू मांडली आहे तर काही म्हणतात हा वाद मुद्दाम वाढवला जातोय. यावर आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. इथले हिंदू आणि मुस्लिम हे इथलेच आहेत, त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच रहावं, द कश्मीर फाईल्स चित्रपटामुळं जे गट पडलेत ते चुकीचे आहेत. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच हा चित्रपट अद्याप पाहिला नसल्याने अधिकचं बोलणं उचित ठरणार नाही. एखाद्या चित्रपटावरून वाद होणं योग्य नाही. असेही ते म्हणाले आहेत.
तसेच यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, ही तेढ कोणता समाज निर्माण करत नाही. जो व्यक्ती अशा पद्धतीने तेढ उसळवतो, त्यांना हे प्रश्न विचारायला हवेत. सगळे सलोख्याने राहत असताना असं मध्येच बिबा घालणं योग्य नाही. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच चित्रपट पहा, त्यातील वस्तुस्थिती कोणाला पटेल, कोणाला पटणार नाही. त्यामुळे गट पडणं साहजिकच आहे. पण तेढ निर्माण करणं चुकीचं आहे, असेही ते म्हणाले आहेत. या चित्रपटावर फक्त मनोरंजन क्षेत्रातूनच नाही, तर राजकीय क्षेत्रातूनही बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावरून गेल्या काही दिवसांपासून बराच वादंग सुरू आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ कमाईत विक्रम तोडण्याच्या उंबरठ्यावर
एकीकडे या चित्रपटावर दोन्ही बाजुने प्रतिक्रिया उमटत असातना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचण्यास सज्ज झाला आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने जवळपास 80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनानंतरचा पहिला आठवडा हा प्रत्येक चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा असतो. याच पहिल्या आठवड्यात ‘द काश्मीर फाईल्स’ने प्रेक्षक-समीक्षकांवर जबरदस्त छाप सोडली आहे. प्रभासचा ‘राधेश्याम’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांचाही त्यावर परिणाम झाला नाही.