सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश
नवी दिल्ली (न्युज नेटवर्क)-
भारतातील सर्व राज्यांना नागरी संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दिवशी सर्व राज्यांत सायरन वाजले जातील. हल्ला होतो, तेव्हा सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात. मात्र, सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे की नाही? किंवा सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सांगितली जात आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याची परिस्थिती आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची चलबिचल झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारत सरकार महत्वाच्या बैठका घेत आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
दिल्लीत हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे. रविवारी भारताच्या हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भारताच्या नौदल प्रमुखांनी देखील भेट घेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चर्चा केल्याचं सांगितलं जातं.
आजही दिवसभर दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळाल. यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना ७ मे रोजी नागरी संरक्षणासाठी ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.