जळगाव ः प्रतिनिधी
आरटीई अंतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मंगळवारी अंतिम मुदत होती. शेवटच्या दिवसापर्यंत 2161 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. अजूनही पहिल्या लॉटरीतील 779 जागा रिक्त आहे.
शिक्षण विभागातर्फे 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून लॉटरी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळवण्यात आली होती. आरटीई 25 टक्केची ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर मार्च महिना अखेरीस पहिली सोडत ऑनलाइन स्वरूपात पार पडली. यात 2940 विद्यार्थ्यांचे निवड झाली असून 2399 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे.
निवड यादीतील विद्यार्थ्यांना सुरूवातीला 20 एप्रिलपर्यंत व नंतर 29 एप्रिलपर्यंत शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती; मात्र शेवटच्या दिवसापर्यंत फक्त 2105 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केल्याने 10 मे पर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवारी 2161 प्रवेश झाले.
जिल्ह्यात 285 शाळा पात्र
पहिल्या यादीतील 779 विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी राहिले आहे. जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 285 शाळा पात्र आहेत. त्यामध्ये एकूण 3147 एवढी प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी एकूण 8354 जणांचे अर्ज दाखल झालेले आहे. दरम्यान, पुढील लॉटरीबाबत माहिती लवकरच जाहीर होइॅल.