धरणाच्या जलपूजनप्रसंगी आ.शिरीषदादा चौधरी यांचे प्रतिपादन
साईमत/रावेर/विशेष प्रतिनिधी
शेळगाव धरणाच्या निर्मितीत अनेक मान्यवरांचा सहभाग आहे. त्यामुळे यावल तालुका हा खऱ्या अर्थाने सुजलाम्-सुफलाम् होणार आहे, असे प्रतिपादन आ. शिरीषदादा चौधरी यांनी केले. ते धरणाच्या जलपूजन केल्यानंतर बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रमेश चौधरी, श्रीराम पाटील, प्रभाकर सोनवणे, लिलाधर चौधरी, अतुल पाटील, इंजिनिअर प्रकाश पाटील, जनाबाई महाजन, शेखर पाटील, किशोर पाटील, प्रल्हाद बोंडे, जगदीश कवडीवाले, अनिल महाजन, चंद्रकला इंगळे, प्रभाकर झोपे, शरद कोठी, डॉ.सुरेश पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, मुकेश येवले, हरिश गणवाणी, गोंडू महाजन, आत्माराम शंकोपाळ, सतिष पाटील, हयात शेठ, जावेद जनाब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अनेक मान्यवरांनी प्रयत्न केले. आ.नाथाभाऊंनी धरणाची मुर्हूतमेढ रोवली. नंतरच्या काळात मी २००९ ते २०१४ मध्ये आमदार असतांना मुख्यमंत्र्यांकडे अनेक बैठका घेतल्या. निधी मंजूर करुन घेतला. नंतरच्या काळात स्व. हरिभाऊ जावळे यांनी प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यामुळेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाचा समावेश बळीराजा संजीवनी योजनेत केला. त्यामुळे प्रकल्पाला केंद्राचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ना. गिरीषभाऊ महाजन हे जलसंपदा मंत्री असतांना त्यांनी दोन वेळा प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली.
जलपूजन करतांना मनस्वी समाधान
आताच्या काळात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रकल्पाच्या अंतर्गत असलेली यावल उपसा जलसिंचन योजना मंजूर करुन घेतली. त्यामुळे तालुक्यातील दुष्काळी गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. मी बुडीत क्षेत्रात जाणारे तीन ठिकाणचे पूल मंजूर करुन घेतले. त्यातील दोन पूल बांधून पूर्ण झाले. अशा सर्वपक्षीय नेत्यांच्या व प्रयत्नाने आज हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. अशा प्रकल्पाचे जलपूजन करतांना मनस्वी समाधान आहे. तालुक्याला सुजलाम्- सुफलाम् करणारा शेळगाव बॅरेज प्रकल्प असल्याचेही आ.शिरीषदादा चौधरी म्हणाले.