साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
रेल्वेचे काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणाऱ्या भरधाव डंपरने मालवाहू पिकअपला समोरून जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही वाहने रस्त्यावर उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन परप्रांतीय मजुर महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य २० ते २५ मजूर जखमी झाले. त्यातील १३ जखमींवर चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर आठ गंभीर मजूरांना धुळे येथे उपचारार्थ दाखल केले आहे. १९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हिरापूर गावाच्या पुढे अरमान हॉटेलजवळ हा भयंकर अपघात घडला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पिकअप वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, हिरापूरजवळ तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू होते. याठिकाणी मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील मजूर काम करत होते. चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर साईराज हॉटेलच्या पाठीमागे रेल्वे लाईनजवळ हे मजूर राहत होते. तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा हिशोब झाल्यावर हे मजूर त्यांच्या गावी भुसावळ येथून कटनी पॅसेंजरने जाण्यासाठी डंपर (क्रमांक एमएच.५ के.९९३६) याने काल रात्री भुसावळकडे जाण्यासाठी निघाले होते.
डंपरमध्ये २५ ते ३० मजूर होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास हिरापूर गावाच्या पुढे अरमान हॉटेलजवळ चाळीसगावकडून नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाला (क्रमांक एमएच.२० सीजी.४४२९) डंपर चालकाने भरधाव वाहन चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यात दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाले.
त्यात डंपरमध्ये बसलेल्या सोनीबाई सोमनाथ यादव (वय ३०, रा. तिनगड्डा, ता.जि. कबिरनाथ छत्तीसगड) आणि सरस्वती रामप्रसाद उईके (वय १७, रा. दामीतितराही, ता.जि. डिंडोरी, मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला तर डंपरमधील अन्य मजूर जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. डंपरचालक अपघाताची खबर न देता पळून गेला. याप्रकरणी संतराम बाबुराम मरकाम (रा. दामितीतराही ता. बंजगमल ता. डिंडोरी) यांच्या फिर्यादीवरून डंपरचालक याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.