पुणे : प्रतिनिधी
राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावची ग्रामपंचायत निवडणूक. या निवडणुकीत ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. शिंदे गटाने वळसे पाटील यांना धोबीपछाड देत ७३ वर्षांची सत्ता उधळून लावली आहेत्यामुळे वळसे पाटील आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यातील ग्रामपंचायती यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. बारामतीत अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व दाखवत ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज केली आहे मात्र दिलीप वळसे पाटील यांना सत्ता राखण्यात यश आलेले नाही. दिलीप वळसे पाटील यांच्या गावातच धोबीपछाड देण्यात आढळराव पाटील यांना यश आले आहे.
राज्यातील घडलेल्या राजकीय घडामोडी आणि राष्ट्रवादी कांँग्रेसमध्ये पडलेले दोन गट याचा या निवडणुकीत विरोधकांना फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आढळराव पाटील यांनी गावोगावी आपले दौरे सुरू केले होते. गावातल्या जवळपास सर्वच सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांना आढळराव पाटील हजेरी लावत होते. त्याचाच फायदा आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटाला झाला असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीत फूट पडून दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते.शरद पवार यांचे सर्वात विश्वासू नेते म्हणून वळसे पाटील यांची ओळख होती. मात्र वळसे पाटील यांच्या निर्णयामुळे कुठे तरी येथील फटका बसल्याचे बोलले जात आहे मात्र दिलीप वळसे पाटील यांच्या ७३ वर्षांच्या सत्तेला निरगुडसर येथे शिंदे गटाने सुरुंग लावला आहे.