चांगले मित्र मिळविण्यासाठी आपणही चांगले असणे गरजेचे

0
9

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

मित्र जीवनातील एक वेगळे नाते आहे. त्याची जोपासना केली पाहिजे. मैत्रीचे जग हे खूप व्यापक आहे. म्हणून निसर्गातील प्रत्येक घटकांशी मैत्री असली पाहिजे. तसेच चांगले मित्र मिळविण्यासाठी आपणही चांगले असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.एस. टी. भुकन यांनी केले. विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैत्री शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून लाभलेले डॉ.एस. टी. भुकन, अधिष्ठाता, आंतर शाखीय विद्याशाखा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले.

प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनीही मैत्रीचे विविध प्रकार सांगत मैत्री ही नेहमी चांगल्या कार्यांना चांगल्या चरित्रांचा निर्माण करणाऱ्या वृत्तीशी असावी, असे सांगितले. तसेच डॉ.एस.एस.पाटील यांनीही सांगितले की, खरा मित्र तोच ज्याच्याशी आपण सर्व वेदना, सर्व दुःख सांगू शकू. ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपण रडू शकू. असा कोणीतरी आपला मित्र असला पाहिजे. अध्यक्ष म्हणून लाभलेले संस्थेचे फैजपूर तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.एस.के.चौधरी म्हणाले की, मैत्री जीवसृष्टीचा श्‍वास प्राण वायू आहे. समाजाचे प्राण वाचवायचे असतील तर मैत्री भाव जोपासला पाहिजे, असे सांगत सर्वांशी बंधुभाव जोपासावा, असे सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी व लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव एम.टी.फिरके, डॉ. एन. ए. भंगाळे, डॉ. जगदीश पाटील प्र. अधिष्ठाता मानव्य विद्याशाखा, डॉ.पी.डी.पाटील आधिसभा सदस्य, उप प्राचार्य डॉ.एस. व्ही.जाधव, डॉ. व्ही.सी. बोरोले आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर दिवसभर डॉ. प्रतिभा सूर्यवंशी यांनी मैत्री आपल्यातील कौशल्यांशी, विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी मैत्री विज्ञान आणि तंत्रज्ञानशी, प्रा.उत्पल चौधरी यांनी मैत्री स्वातंत्र्यसैनिकांशी, व प्रा.प्राजक्ता काचकुटे आणि प्रा.शिवाजी मगर यांनी मैत्री विविध खेळांशी विषयावर मार्गदर्शन केले. सायंकाळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या.

यशस्वितेसाठी कॅप्टन राजेंद्र राजपूत, प्रा.शुभांगी पाटील, प्रा.राकेश तळेले, प्रा.जयश्री पाटील, प्रा.सरला तडवी, प्रा.उन्नती चौधरी, कॅप्टन राजेंद्र राजपूत, प्रा. शेरसिंग पाडवी, प्रकाश भिरुड, अमित गारसे, नितीन सपकाळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे, सूत्रसंचालन कॅप्टन राजेंद्र राजपूत व प्रा.उन्नती चौधरी तर आभार डॉ.अचल भोगे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here