साईमत, जळगाव, प्रतिनिधी
जागतिक व्यावसायिक बदलामुळे शैक्षणिक बदल घडून आले आहेत. पारंपरिक शिक्षण आणि नोकरी या पलीकडे जाऊन नवीन उद्योगधंदे आणि व्यवसाय उदयास येत आहेत. या नव्याने उदयास येणाऱ्या क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास त्या क्षेत्राशी संबंधीत विषयात पारंगत असणे काळाची गरज आहे. तुमचे कौशल्य आणि अभ्यासक्रम यांची सांगड घालून तुम्ही शिक्षणक्रम पूर्ण केला तर भविष्यात या क्षेत्रात करियरच्या अनेक संधी प्राप्त होतात. तसेच उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसायाच्या संकल्पना मांडणे, त्यावर काम करणे आणि त्याचा विस्तार करणे इतकाच नव्हे, तर जगावेगळा विचार करून आपले उत्पादन जगातील सर्वश्रेष्ठ उत्पादन बनवणे हा होय, असे प्रतिपादन मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. प्रसाद तिगलपल्ली त्यांनी केले.
येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच नवीन कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा, हा प्रमुख उद्देश समोर ठेवून 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान ‘जर्नी ऑफ इनोवेशन स्टार्टअप अँड इंटरप्रनर्शिप’ या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. प्रसाद तिगलपल्ली व
येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या रिसर्च डीन प्रा. गीता धर्मपाल यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते.
देशभरातील तरुणाईसाठी ‘गांधीतीर्थ’ प्रेरणादायी : प्रा.गीता धर्मपाल
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात गांधी रिसर्च फाउंडेशनच्या रिसर्च डीन प्रा. गीता धर्मपाल यांनी देशभरातील तरुणाईसाठी ‘गांधीतीर्थ’ प्रेरणादायी स्थळ असून महात्मा गांधीजींच्या विचारांची, संस्कारांची आजही गरज आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांचे महत्त्व आजही, भविष्यातही महत्त्वपूर्ण असून ते जगमान्य आणि कालातीत आहेत. संपूर्ण जगाला गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याशिवाय पर्याय नाही. महात्मा गांधीजींच्या विश्वस्त भावनेतून समाजाकडे बघून विद्यार्थ्यानी कार्य करावे,’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर कार्यशाळेत अभियांत्रिकी व व्यवस्थापन या विषयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी एमबीए विभागप्रमुख कौस्तव मुखर्जी, प्रा. विशाल राणा, प्रा. जितेंद्र जमादार, प्रा. परिशी केसवानी, प्रा. तन्मय भाले, प्रा. योगिता पाटील व आदींनी सहकार्य केले तर कार्यशाळेचे सूत्रसंचालन विवेक पाटील या विद्यार्थ्याने केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. ज्योती जाखेटे यांनी मानले.