६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास ८३ हजारांहून अधिक किमतीचा ऐवज गायब
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे बाजार परिसरात एकच खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्युत कॉलनी परिसरातील रहिवासी बाली भरतसिंग राजपूत (वय ६२) या शनिवारी, ११ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजता कासमवाडी येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. नेहमीप्रमाणे बाजारात मोठी गर्दी असल्याने चोरट्यांनी याच गर्दीचा अचूक फायदा घेतला.
खरेदीदरम्यान अज्ञात चोरट्याने अत्यंत हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून नेली. काही वेळानंतर पोत गायब झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. घटनेनंतर त्यांनी तात्काळ परिसरात शोधाशोध केली, मात्र चोरट्याचा कोणताही मागमूस लागला नाही.
चोरीस गेलेल्या सोन्याच्या पोतमध्ये सोन्याच्या वाट्या असून तिचे एकूण वजन २३.८९ ग्रॅम असल्याचे समोर आले आहे. बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत सुमारे ८३,२९५ रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या बाली राजपूत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान टहकळे करत आहेत. दरम्यान, शहरातील गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांनी, विशेषतः महिलांनी दागिन्यांबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
