साईमत/ न्यूज नेटवर्क । पहुर, ता.जामनेर ।
येथे सध्या मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. शेतशिवारात अशा मोकाट गुरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ग्रामपंचायतीने त्वरित मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वीरेंद्र लोढा यांनी केली आहे. पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी ग्रामपंचायतींशी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही अद्याप ग्रामपंचायतीने मोकाट गुरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.
पहुर हे जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील गाव आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच ही मोकाट गुरे इतरत्र बसलेली असतात. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असतो. तसेच शेत शिवारात रात्रीच्या वेळेला 40 ते 50 गाईगुरे शेतांमध्ये जाऊन नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आधीच विविध समस्यांनी शेतकरी ग्रासलेला आहे. मोकाट गुरांकडून होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या वर्मी घाव घालत आहे.
याविषयी पहूर येथील शेतकरी वीरेंद्र लोढा यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत पहूर पेठ, पहूर कसबे यांना लेखी, तोंडी सूचना देऊनही त्या मोकाट गुरांचा बंदोबस्त झालेला नाही. पोलीस प्रशासनानेही ग्रामपंचायतीला वेळोवेळी मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याविषयी सुचविणे आहे. मात्र, अद्यापपर्यंत ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केलेली नाही. मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.