Former Minister Bachchu Kadu Warns : शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शासनाला स्वस्थ बसू देणार नाही : माजी मंत्री बच्चू कडू यांचा इशारा

0
5

दाताळातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात प्रहार जनशक्तीचे संस्थापक-अध्यक्ष बच्चू कडू यांचा इशारा

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

शेतकऱ्यांना कोणताही जात-धर्म नसतो. तो जगाचा पोशिंदा आहे. अशा शेतकऱ्यांवरच विश्वासघाती महायुती सरकार वेळोवेळी अन्याय करण्याचेच काम करीत आहे. तेव्हा शेतकरी राजाला जोपर्यंत त्यांच्या हक्काचा न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. तालुक्यातील दाताळा येथे २८ मे रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांची जाहीर सभा व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख गजानन लोखंडकार, जिल्हा उपप्रमुख अजय टप, बलराम बावस्कर, संभाजी शिर्वे, विलास खर्चे, तालुकाध्यक्ष अजित फुंदे, शहराध्यक्ष शालीकराम पाटील, नांदुरा तालुका प्रमुख मानकर, अर्जून पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी राजा हा आपल्या घामाकष्टाने शेती पिकवितो.मात्र, त्यांच्या माालाला योग्य भाव मिळत नाही. एकीकडे पीक विम्याच्या नावाखाली पीक विमा मंजूर होतो. मात्र, तो पीक मिळण्यासाठी त्यांना वर्षोगणती वाट पहावी लागत आहे. त्यातही काहींवर पिक विम्यामध्येही अन्याय करून त्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे गाजर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्यावेळी दिले होते. आज राज्यात त्यांचे सरकार बसले. मात्र, त्यांना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असल्याचेही ते म्हणाले.

….तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही

शेतकऱ्यांना आश्वासनांची केवळ खैरात वाटत त्यांची महायुती सरकारने थट्टाच चालविली आहे. राबराब राबून एका दाण्याचा हजारो दाणे करणारा शेतकरी राजाला नफा का मिळत नाही? त्याचे जीवनमान का उंचावत नाही? त्याची लेकरी चांगल्या शाळेत का शिक्षण घेवू शकत नाही? असे एक ना अनेक प्रश्न असूनही सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे. तेव्हा शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही. त्यांच्या जीवनात सुख, समाधान व उन्नतीची पहाट उगवत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि विश्वासघाती सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

कुटील डाव हाणून पाडण्याचे आवाहन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा अशीच आश्वासनांची खैरात वाटण्यात येईल. तेव्हा मतदारांनी सावध होवून त्यांचा असा कुटील डाव हाणून पाडावा, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले. यावेळी मलकापूर तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकरी, नागरिक, महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन तथा आभार श्रीकृष्ण भगत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here