जारगावला आयोजित शेतकरी मेळाव्यात वैशालीताई सूर्यवंशींचे टिकास्त्र
साईमत।पाचोरा।प्रतिनिधी।
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली आहे. त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात सापडला असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी केले. त्या जारगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या.
शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान, खडकदेवळा-लोहटार जिल्हा परिषद गटाचा शेतकरी मेळावा जारगाव येथे आयोजित केला होता. त्यात राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे कृषी तज्ज्ञ प्रा. सुदामसिंग राजपूत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून मी मतदारसंघात फिरत आहे. सर्वसामान्यांचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तात्यासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींनी हा मतदारसंघ भकास करण्याचे पाप केले तर मी सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी मी कटीबध्द आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. गिरणेवरील बंधाऱ्यांसाठी कुणीही प्रयत्न करत नाही. नदीतून बेसुमार वाळू उपसा झाल्याने गिरणा काठ उध्वस्त झाला आहे.
यांची होती उपस्थिती
मेळाव्याला रमेश बाफना, राजेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, उद्धव मराठे, अरुण पाटील, शरद पाटील, ॲड.अभय पाटील, संतोष पाटील, बाळु अण्णा, गजू पाटील, शरद पाटील, योजनाताई पाटील, मनीषा पाटील, बेबाताई पाटील, उषाताई परदेशी, गायत्री पाटील, मुकेश पाटील, सुरेखा वाघ, शशी बोरसे, प्रमोद नाना पाटील, तिलोत्तमा मौर्य, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र राणा, अनिल सावंत आदींची उपस्थिती होती.