धरणगावला पाणी पुरवठा सुरळीत करा, नवीन पाईपलाईन ‘फेल’

0
69

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

शहरात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. यासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करून नागरिकांना नियमित शुध्द पाणी पुरवठा करावा, या मागणीसाठी शिवसेना-उबाठा पक्षाने बुधवारी, २९ मे रोजी धरणगाव नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे. धरणगाव शहरात सध्या अतिशय तीव्र पाणीटंचाई असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या अनुषंगाने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका गाठली. येथे मुख्याधिकारी नसल्याने पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडून रोष व्यक्त केला आहे. याप्रसंगी पक्षाच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांच्या नावे एक निवेदन लागू केले आहे.

शहरातील जैन गल्ली येथे नवीन पाईप बसवून पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यात थेट व्हाईट हाऊसपासून ते जैन गल्लीपर्यंत आणि परिसरात ज्यांनी नळ घेतलेले आहेत. त्यांना व्यवस्थित पाणी येत नव्हते. ज्यांना थोडेफार पाणी आले ते कमी दाबाने आले. याकडे नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या भागात नवीन नळ कनेक्शन घेण्यात आले आहे. त्या भागात पाणी पुरवठ्याच्या दिवशी ठेकेदाराचे कर्मचारी नसतात. यासोबत, शहरात करण्यात येणारा पाणीपुरवठा हा फिल्टर न करता येत असल्यामुळे शहरात डेंग्यू, ताप आदी साथीचे आजार पसरलेले आहेत. शहरात होणारा पाणी पुरवठा हा अशुध्द प्रकारातील आहे. याकडे लक्ष देऊन शुध्द पाणी पुरवठा आणि तो सुरळीतपणे करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

आंदोलनात शिवसेना-उबाठा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख जयदीप पाटील, बामसेफ आबा वाघ, हेमंत महाजन, परमेश्‍वर महाजन, कृपाराम महाजन, रमेश पांडे, नदीम काझी, संजय पटूने, रणजित सिकरवार, माजी नगरसेवक भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, राहुल जैन आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.

पाणीप्रश्‍नावर करोडो रुपयांचा चुराडा

धरणगाव शहरातील पाईपलाईन योजना ही सुमारे ९० किमी आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रशासनाने खर्च केला आहे.जनतेच्या पैश्‍याचा दुरुपयोग होत आहे. पाणीपुरवठा योजना पूर्णतः फेल झाली आहे. नागरिकांना गेल्या दोन वर्षांपासून फक्त दररोज पाणी देऊ, अशी वलग्ना करणाऱ्या पाणीपुरवठा मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

-गुलाबराव वाघ, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख

जुनीच पाईपलाईनने पाणीपुरवठा करा

जैन गल्ली येथे नवीन पाईपलाईन पाणीपुरवठा केला होता. परंतु पाण्याला फोर्सच नव्हता. पहिलेच १२ ते १३ दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. नवीन लाईनपेक्षा जुन्याच लाईनवर पाणी द्या.

-प्रदीप भाटिया, नागरिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here