युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा
साईमत /जळगाव /प्रतिनिधी :
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतानाच, मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला जळगावात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी अचानक आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे निवडणूक काळातच पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना उद्देशून अधिकृत राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी राजीनाम्याचे कारण वैयक्तिक असल्याचे नमूद केले आहे. “माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच युवक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी, दिलेला सन्मान तसेच नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे. पक्षाचा आपण आजन्म ऋणी राहू, असेही त्यांनी नमूद केले आहे.
मात्र, त्यांच्या या अचानक निर्णयामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य आणि संभ्रमाचे वातावरण आहे. अलीकडील काळात अनेक अनुभवी नेते व पदाधिकारी पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवार गटाकडून संघटनात्मक मजबुतीवर विशेष भर दिला जात होता. अशा परिस्थितीत युवक संघटनेतील जिल्हास्तरीय नेतृत्वाचा राजीनामा पक्षासाठी आव्हानात्मक ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे.
आगामी काळात जळगाव जिल्ह्यात युवक नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचे मोठे आव्हान आता राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वासमोर उभे राहणार आहे. दरम्यान, विश्वजीत पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्ष व नेतृत्वाबद्दल आदरभाव व्यक्त केल्याने त्यांनी कोणतीही पक्षविरोधी भूमिका घेतलेली नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ते पुढील काळात कोणती राजकीय भूमिका घेतात, पुन्हा सक्रिय राजकारणात दिसतात की काही काळ विश्रांती घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
