साईमत चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव रेल्वे स्थानक हे तीन जिल्ह्याच्या सीमेवर असून येथून अनेक प्रवासी प्रवास करतात मात्र पाहिजे तेवढ्या रेल्वे गाड्याना चाळीसगाव स्थानकावर थांबा नाही, रेल्वे विभागाने रेल्वे गाड्यांना येथे थांबा दिल्यास सरकारी नोकरदार, विद्यार्थी तसेच छत्रपती संभाजी नगर, नासिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने रेल्वे गाड्याना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देवून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने डी. आर. एम. भुसावळ यांना चाळीसगाव रेल्वे प्रबंधक द्वारा निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक एक्सप्रेस डाऊन गाडी नंबर १२६२७ ही दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी तर अप १२६२८ ही गाडी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी धावते या गाडीला चाळीसगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा. गोवा एक्सप्रेस डाऊन गाडी नंबर १२७७९ ही दुपारी ११ वाजून २० मिनिटांनी तर अप १२७८० ही गाडी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी धावते या गाडीला चाळीसगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा. गीतांजली एक्सप्रेस डाऊन गाडी नंबर १२८५९ ही सकाळी ११ वाजता तर अप १२८६० ही गाडी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी धावते या गाडीला चाळीसगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा. रामेश्वर ते ओखा एक्सप्रेस डाऊन गाडी नंबर १६७३३ ही दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी तर अप १६७३४ ही गाडी पहाटे ४ वाजता बुधवारी धावते या गाडीला चाळीसगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा. चाळीसगाव रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसचा सकाळी ६ वाजेची वेळ असून ती सकाळी ७ वाजता करण्यात यावी वेळ बदल्यास जळगाव अप डाऊन करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे. देवळाली पॅसेंजर डाऊन गाडी नंबर ११११३ ही सकाळी ९ वाजून ४५ वाजता तर अप ११११४ ही गाडी रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी धावते या गाडीचा वेळ देखील पूर्वीचा करण्यात यावा, भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस गाडी ऐन लग्नसराई सुरू असताना एक महिना बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत असून. हुतात्मा एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यात यावी. चाळीसगाव धुळे पॅसेंजर अठवड्यातील चारही रविवारी सुरू करण्यात यावी.
कारण या गाडीला मेमू रेल्वेचा रॅक नसल्यामुळे मेंटनन्सची गरज नसल्यामुळे रविवारी गाडी बंद करणे म्हणजे प्रवाशांना सोयीपासून वंचित ठेवण्यासारखेच आहे. वरील सर्व रेल्वे गाड्या चाळीसगाव स्थानकावर न थांबता धावतात त्या चाळीसगाव स्थानकावर थांबल्यास प्रवाशांना सपूर्ण देशात या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करता येणार आहे. म्हणून डी. आर. एम. भुसावळ यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड यांच्याकडे पाठपुरावा करून चाळीसगाव स्थानकावर गाड्याना थांबा देण्यात यावा.
मागण्या मान्य न झाल्यास रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव रेल्वे स्थानक परीसरात आंदोलन करण्यात येईल. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास डी आर एम भुसावळ व रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा ही रयत सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाची प्रत खासदार उन्मेश पाटील यांना पाठविण्यात आली आहे. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी एन पाटील , भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे अध्यक्ष खुशाल पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले , रमेश पवार,कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर शहराध्यक्ष छोटू अहिरे, शिक्षक सेनेचे शहरअध्यक्ष सचिन नागमोती,शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक दीपक देशमुख, सुभाष बजाज, दिलीप पवार, शिवाजी पवार ,रमेश पवार, किरण शेवरे, अनिल पाटील, रावसाहेब पाटील, अजय देशपांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.