मलकापूर : प्रतिनिधी
नांदुरा तालुक्यातील काही अंतरावरील दहिवडी ते केदार रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केदार येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
दहिवडी ते केदार या रस्त्यावर वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर दहिवडी, केदार, भिलवडी, बुर्ती, खुमगाव, धाडी, मामुलाडी, जिगाव नवे, जीगाव रस्त्याला लागणारी आदी गावे येतात. या गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता आहे. दररोज हजारो नागरिक वाहनांची ये-जा होत आहे. लोडिंगचे ट्रक जिगाव प्रकल्पासाठी जात आहे. रेल्वेच्या कामासाठी जाणारे ट्रक पाणीपुरवठा विभागाअंतर्गत पाण्याची टाकीचे काम धाडी येथे जात असलेले लोडिंगचे ट्रक तसेच रेल्वेच्या पुलाच्या कामासाठी लोडिंगचे जाणारे ट्रक व रेती, मुरूम वाहन जातात.
रस्त्याची अवस्था दयनीय
नांदुरापासून केदार हे गाव अकरा किमी अंतरावर आहे. त्यामुळे या गावातील व इतर गावांमधून ८० ते ९० टक्के नागरिक नांदुराला शिक्षण, व्यवसाय व नोकरी करण्याकरिता ये-जा करतात. परंतु रस्त्याची अवस्था दयनीय असून गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची दुरुस्ती ही प्रशासनाकडून झालेली नाही. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडून येतात. यामध्ये अनेक जण जखमी होत आहेत आणि अनेक नागरिकांना मणक्याचा आजार व इतर आजार झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केदार गावातील नागरिकांमधून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी ते केदार रस्त्याकडे लक्ष देतील काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.