शेतकऱ्यांचा भारनियमनप्रश्नी अभियंत्यास घेराव

0
32

साईमत, धुळे : प्रतिनिधी

भारनियमनप्रश्नी शेतकऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी दोन तास वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना सोमवारी घेराव घातला. दुहेरी भारनियमनाची जाचक अट शिथील करण्यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तीन मागण्या तत्काळ मंजूर झाल्या. उर्वरित मागण्यांबाबत शासन दरबारी प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. दोन आठवड्यांआत सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक गंगाधर माळी यांनी दिला.

यावेळी शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, श्री. माळी, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, बाबाजी पाटील, आनंदा बडगुजर, राजेंद्र माळी, प्रभाकर चौधरी, विलास चौधरी, संतोष खैरनार, गजानन आधार, मोहन सूर्यवंशी, दिलीप माळी, महेंद्र खैरनार, अशोक महाले, संजय माळी, दीपक बडगुजर, रोहिदास माळी, अनिल पाटील, चंद्रशेखर पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मर्जीप्रमाणे दुहेरी भारनियमनाची अट

शेतकऱ्यांबाबत एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्री, अशी भारनियमनाची जाचक अट आहे. राज्य शासनाने बारा तासांच्या भारनियमनाव्यतिरिक्त मर्जीप्रमाणे दुहेरी भारनियमनाची अट लादली आहे. दुष्काळीस्थितीत थकीत बिले वसुलीसाठी वीज कंपनी तगादा लावत आहे. यासंदर्भात घेरावकर्त्यांनी केलेल्या मागण्यांप्रमाणे डिसेंबर २०२३ पर्यंत वीज महावितरण कंपनी शेतकऱ्यांकडून थकीत बिले वसुलीसाठी तगादा लावणार नाही. शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी व शेतमजूरांना सिंगल फेज लाईन उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती पावले तत्काळ उचलली जातील. शेतातील डीपी अथवा वीज वितरणाच्या लाईन नादुरुस्त असतील तर ते दुरूस्तीसाठी कंपनीकडून वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले जाईल. पथकातील समन्वयक २४ तास संपर्कात राहील, असे ठरले. शेतकऱ्यांसाठी किमान दिवसा दहा तास वीज उपलब्धतेसाठी प्रस्ताव पाठविला जाईल , अशी हमी अधीक्षक अभियंत्यांनी आंदोलकांसमोर दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here