अवकाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची स्थिती
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यात बहुतांश ठिकाणी वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच केळीची लागवड करणारे शेतकरी सुखावले आहेत. कारण बहुतांश शेतकऱ्यांचे पाणी कमी पडू लागल्याने केळी बागा करपू लागल्या होत्या. मात्र, अचानक झालेल्या पावसाने करपणाऱ्या केळींना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तसेच परिसरात रब्बीची लागवड शेतकऱ्यांनी उशिरा केल्यामुळे मका हे मुख्य पीक व कांदाचे बी उभे होते. मात्र, वादळी पावसाने बऱ्याच प्रमाणात त्याचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था झाली आहे. तसेच परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडांनाही फटका बसला आहे. बऱ्याच झाडावरील आंबे पडल्याने त्याठिकाणी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे तालुक्यात चित्र आहे.