MP Anup Agarwal : शासनाच्या योजनेचा लाभ मिळून गरजूंना दिलासा द्या : आ.अनुप अग्रवाल

0
7

धुळ्यातील आरोग्य सेवकांच्या बैठकीत आवाहन

साईमत/धुळे/प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा मिळावा. त्यातून महाराष्ट्रात धुळे जिल्हा योजनेचा सर्वाधिक लाभार्थ्यांचा जिल्हा बनावा, यासाठी आपण सर्वांनी झोकून देत काम करावे. लाभार्थी रुग्णांना योजनेचे बारकावे समजून सांगावेत, शासनाच्या योजनेचा लाभ मिळून गरजूंना दिलासा मिळेल, असे आवाहन आ.अनुप अग्रवाल यांनी केले.

राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणाऱ्या शहर परिसरातील विविध रुग्णालयांतील आरोग्य सेवकांची ए. बी. फाउंडेशनच्या पुढाकाराने आ.अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी, १९ जून रोजी बैठक झाली. त्यात आ.अग्रवाल यांनी विविध सूचना देतानाच आरोग्य सेवकांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी ए. बी. फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक समीर खान, योगेश चौधरी, सुभाष मोरे यांच्यासह विविध रुग्णालयातील आरोग्यसेवक उपस्थित होते.

अनेकदा विविध खासगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे आरोग्य सेवक हजर नसतात. त्यामुळे गरजू रुग्णांची परवड होते. महागड्या आजारांवर उपचारांसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते हतबल होतात. त्यामुळे प्रत्येक गरजू रुग्णाला योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आपण नियुक्त रुग्णालयात ठरलेल्या वेळेत आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहावे. अनेकदा योजनेचा लाभ मिळवून देताना रुग्णालयांकडून गरजूंकडे पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. असे प्रकार होत असतील, ते गंभीर आणि चुकीचे आहे. यापुढे असे घडले तर थेट माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहनही आ.अग्रवाल यांनी केले.

धुळे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने शहरातील विविध रुग्णालयात सर्वाधिक रुग्ण येतात. त्यामुळे आपल्यावर अधिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने आपण सदैव तत्पर राहावे. मी यापूर्वीही आरोग्य सेवकांच्या स्थानिक पातळीवर असलेल्या समस्या, अडचणी सोडविल्या. अजूनही काही समस्या, अडचणी असतील तर त्यासाठी आमदार म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा करून त्या सोडविल्या जातील. त्यासाठी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आ.अग्रवाल यांनी केले.

अनुचित प्रकारांबाबत तक्रार करण्याचे आवाहन

समाजातील गरजू रुग्णांची सेवा घडावी, आपल्या हातून पुण्यकर्म घडावे, म्हणूनच भगवंताने आपली या कामासाठी निवड केली आहे, असे समजून आपण गरजू नागरिकांना मदत, सहकार्य करा. गरजू रुग्णांना लाभ देतांना कुठेही अनुचित प्रकार घडत असेल तर जागरूकतेने तक्रार करा. त्यामध्ये गरजू रुग्णांची आर्थिक लूट होता कामा नये, यासाठी सजग राहा. यामध्ये कुठलाही आर्थिक अपहार होता कामा नये, त्याची काळजी घ्या, असे आवाहनही आ.अग्रवाल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here