Guardian Minister Jayakumar Rawal : प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उत्कर्ष ग्राम अभियान : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास होणार : पालकमंत्री जयकुमार रावल

0
5

शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोसमधील आश्रमशाळेत प्रतिपादन

साईमत/धुळे/प्रतिनिधी :

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उत्कर्ष ग्राम अभियानाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा मिळणार आहेत. आदिवासी समाजात धरती आबा योजनेमुळे परिवर्तन होणार आहे. आदिवासी समाजाचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. धरती आबा जन भागीदारी अभियानातंर्गत शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील शासकीय आश्रमशाळेत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

शिबिरास कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा सभापती नारायण भाऊसाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार अनिल गवांदे, अपर तहसीलदार संभाजी पाटील, महिला बाल विकास अधिकारी अजय फडोळ, गटविकास अधिकारी आर. एम. नेतनराव, गटशिक्षण अधिकारी डी. एस. सोनवणे, कृषी अधिकारी देवेंद्र नागरे, जि.प.चे माजी सभापती महावीर सिंग रावल, पंचायत समिती सभापती रणजितसिंग गिरासे, माजी जि.प. सदस्य महेंद्रसिंग गिरासे, पंकज कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम चव्हाण उपस्थ‍ित होते.

देशातील आदिवासी समाजाच्या जीवनात मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानासाठी देशभरातील सुमारे ६३ हजार आदिवासी गावांची निवड केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ४ हजार ९७५ गावांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील २१३ गावांचा अभियानात समावेश आहे.

धरती आबा योजनेंतर्गत गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, प्रत्येक घरात वीज, प्रत्येक घरात गॅस जोडणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, माता कल्याण, पोषण आहार अशा २५ योजना धरती आबा योजनेच्या माध्यमातून लागू केल्या आहे. योजनेंतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा मिळणार आहे. आदिवासी समाजामध्ये धरती आबा योजनेमुळे परिवर्तन होणार आहे. अनुसूचित जमातीच्या नागरिकांनी अभियानातंर्गत केंद्र व राज्य शासनामार्फत वैयक्ति सामूहिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.रावल यांनी केले.

शिबिरात आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान कार्ड, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, बुडीत मजुरी, कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा योजना, कृषी विभागामार्फत भुईमूग बियाणे १०० टक्के अनुदानावरील योजना, ग्रामविकास विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना, महसूल विभाग अंतर्गत श्रावण बाळ योजना, रेशन कार्ड, ॲग्री स्टॅक योजना, जिवंत सातबारा, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, मोफत घरकुल वाळू लाभार्थी, शिक्षण विभागामार्फत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे धनादेश वाटप, आरोग्य विभाग अंतर्गत सिकलसेल तपासणी शिबिर, महिला बालविकास प्रकल्प विभागामार्फत लेक लाडकी प्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांना विविध योजनेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात १७ विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी दशरथ शिंदे, शामकांत पाटील, मनीष पाटकरी, मनोज पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप पाटील, उदय पवार, राजेश गायकवाड, पी. आर. पाटील यांच्यासह अक्कलकोस शाळेतील सर्व कर्मचारी मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here