धुळ्याच्या विचार पुष्प वाचक मंचकडून कवितांचे अभिवाचन
जळगाव (प्रतिनिधी)-
मनुष्याच अस्तित्व झाडांमध्ये आहे असं सांगत मराठी कवींच्या झाडांच्या कविता सादर करत झाड व माणूस यांचा अनोन्यसंबंध दाखवणारा “झाडांच्या मनात जाऊ” हा कार्यक्रम जळगाव येथे सादर झाला.
परिवर्तन जळगाव नेहमीच जे उत्तम आहे. त्याचा शोध घेऊन ते जळगावकर रसिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असत. याच उपक्रमांतर्गत धुळे येथील विचार पुष्प वाचक मंच निर्मित व अपूर्वा पाटील दिग्दर्शित झाडांच्या मनात जाऊ हे कवितांचा अभिवाचन आयोजित करण्यात आल होतं. सुरूवातीला पुलवामा येथील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“झाडांच्या मनात जाऊ” कार्यक्रमात कवी ना. धो. महानोर, भालचंद्र नेमाडे, नरेश पाटील, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, जगदीश कुवर, श्रीकांत देशमुखांसह अनेक कवींच्या कविता सादर करण्यात आला. अपूर्वा पाटील व आरती बरीदे यांनी निवेदनाने हा कार्यक्रम सूत्रबद्ध केला. मानव आणि निसर्ग या नात्याचा शोध उत्कृष्टपणे त्यांनी घेतला. या कार्यक्रमात अरुंधती ब्रम्हे, पुष्पा बोरकर, डॉ. सुप्रिया पाटील, पुष्पा कानडे यांनी उत्कटपणे कविता सादर करून रसिकांची मन जिंकून घेतली.
विचार पुष्प वाचक मंच 25 वर्षापासून धुळे शहरात पुस्तक भिशी चालवतात सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती करणे हेदेखील त्यांचे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी मराठी भाषेतील उत्कृष्ट कार्यक्रम निर्मित करणे ही त्यांची परंपरा आहे. यावर्षी माणूस आणि निसर्ग यांचा सांधा जोडत निर्माण केलेला कार्यक्रम परिवर्तनच्या वतीने जळगाव येथील महावीर क्लासेस येथे सादर करण्यात आला.