अरबी समुद्रात पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलल्यानंतर पाकिस्तान सावध झाला आहे. दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि संरक्षण मंत्रालयांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे.पाकिस्तानी वायूदलाची लढाऊ विमाने कालपासून सीमारेषेवर गस्त घालत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानी नौदलाने अरबी समुद्रात लष्करी कवायत सुरु केली आहे. पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौकांवरुन क्षेपणास्त्रे डागण्याचा सराव सुरु आहे.
अरबी समुद्राच्या उत्तर भागात या लष्करी कवायती सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नौदलाकडून व्यापारी जहाजांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्यापारी जहाजांनी लष्करी कवायती सुरु असलेल्या भागात येऊ नये. या लष्करी कवायती 24 व 25 एप्रिलला सुरु असतील, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक केला जाऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. दिल्लीत बुधवारी संरक्षण मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर भारतीय नौदल आणि वायूदल कमालीचे सक्रिय झाले आहे. भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानची टेहळणी विमाने ही भारतीय सीमारेषेलगत गस्त घालताना दिसत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच मोदी दौरा अर्धवट सोडून भारतात परतले पंतप्रधान मोदी यांनी सौदीला जाताना पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला होता. परंतु, भारतात परत येताना मोदींनी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला नाही. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.