नशिराबाद, बेळीच्या शेतकऱ्यांचे ‘पैनगंगा’ने ५० लाख थकवले
जळगाव (प्रतिनिधी)-
बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा साखर कारखान्याने जळगाव तालुक्यातील नशिराबाद आणि बेळी परिसरातील शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला. मात्र पाच महिने उलटूनही मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. थकलेल्या ५० लाख रुपयांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची याचना केली आहे.
शेतकऱ्यांनी अनेकवेळा पैनगंगा कारखान्याच्या प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, प्रत्यक्ष भेटी घेऊनही पैशांची मागणी केली. मात्र, त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. टाळाटाळ आणि दुर्लक्षामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. पेमेंट न मिळाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
8 जानेवारीपासून पैनगंगा साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नशिराबाद, बेळी आणि निमगाव शिवारातील शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला होता. कंपनीने 20 दिवसांत पेमेंट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत पेमेंट जमा झालेले नाही. कारखान्याकडून उडवाउडवीची भूमिका घेतली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना राकेश पाटील, प्रभाकर नारखेडे, रामदास पाटील, माधुरी पाटील, प्रमोद पाटील, शरद चौधरी, प्रकाश नारखेडे, हरी पाचपांडे, लिलाधर नारखेडे, चंद्रकांत नारखेडे, स्वानील पाटील, ज्ञानदेव धांडे, नरेंद्र भंगाळे, प्रदीप नारखेडे, नामदेव महाजन, शरद राणे, प्रवीण राणे, सुभाष भोई आदी उपस्थित होते .