साईमत / मुंबई / प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून खालापूर ते पनवेल दरम्यान झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, पोलो कार अतिवेगात ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटला आणि कार पलटली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून वाहनातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, बुधवारीही याच एक्सप्रेसवेवर चार ते पाच वाहनांच्या साखळी धडकेत तीन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
