चिखलामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना
साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी :
येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. भाजीपाला विक्रेत्यांना बाजार समितीच्या आवारातच चिखलात प्लास्टिकची पाल टाकून भाजीपाल्याच्या लिलाव करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी आणताना चिखलामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरात बस स्थानकाच्या बाजूला बाजार समितीचे आवार आहे. आवारात व्यापाऱ्यांचे गोडाऊन आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालासह भाजीपाल्याचा लिलाव अनेक वर्षापासून होत आहे. पावसाळ्याची सुरुवात होताच बाजार समितीच्या परिसरात कोणतीही जलनिचरा व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचून अक्षरशः चिखल होतो. चिखलातच शेतकऱ्यांना पाल टाकून आपल्या मालाचा लिलाव करावा लागतो. त्यामुळे भाजीपाला खराब होऊन कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. याच परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली असल्याने दुर्गंधी येते. तसेच जागेचा वापर लघुशंकेसाठी केला जातो. पाऊस सुरू असल्यास शेतकऱ्यांचा माल पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था बाजार समितीमध्ये आढळून येत नाही.
काँक्रीटीकरण करण्याची मागणी
गेल्या अनेक वर्षांपासून ह्या समस्येला स्थानिक व्यापारी व शेतकरी सहन करीत आहेत. अनेकवेळा बाजार समितीच्या प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यावरून प्रशासनाच्या उदासीनतेचा शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बाजार समितीच्या आवारात लिलाव होतो. त्या जागेत किमान काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी केली आहे.