राज्य सरकारचे मोठे पाऊल, पर्यावरणपूरक वाहतूक धोरणाला गती
साईमत / मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी बस आता पूर्णपणे इलेक्ट्रिक होणार आहे. राज्य सरकारने आपल्या धोरणात बदल करत ताफ्यातील २२ हजार बस टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.
सध्या २२ हजारमध्ये सुमारे ८०० बस इलेक्ट्रिक आहेत. पुढील काही वर्षांत उर्वरित डिझेल बसेसचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करून राज्यातील सरकारी बस सेवा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल, असे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरण आणि आर्थिक फायद्यासाठी उपाय
राज्यभरात चार्जिंग स्टेशन उभारल्या जातील, ज्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. इलेक्ट्रिक बसमुळे वीज ग्रिडवरील अवलंबित्व कमी होईल तसेच कर सवलत आणि टोल माफीमुळे आर्थिक बचतही होईल.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. राज्य सरकार महामार्गांवर दर २५ किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारणार असून चार्जिंग तंत्रज्ञानासाठी अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
