साईमत, नाशिक : प्रतिनिधी
राज्यात गेल्या सात महिन्यांत सर्वाधिक 578 अपघाती मृत्यू नाशिकमध्ये झाले. महाराष्ट्रात रस्ता अपघातांत 15 हजार 224 मृत्यू झाले असून, देशात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.
शहरांप्रमाणेच खेड्यापाड्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे पोहोचल्याने वाहनांची संख्याही वाढली. चकाचक रस्त्यांमुळे व्ोगही वाढला. परंतु, वाहन चालविताना वाहतूक नियमांचा जाणीवपूर्वक विसर पडल्याने अपघातांची संख्या व्ोगाने वाढत आहे. परिणामी, विशेषत: दुचाकी अपघाती मृत्युंमध्ये हेल्मेट न घातल्याने सर्वाधिक मृत्यू झाले. तर, समृद्धी महामार्गावरील अपघातातील 101 बळी हे मनुष्य चुकीमुळेच गेले आहेत. रस्ता अपघातांत बळी जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. जगभरातील रस्ता अपघातांत वर्षाला 13 लाख मृत्युमुखी पडतात, तर भारतात एक लाख 53 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे विकासासाठी रस्त्यांची निर्मिती होत असताना दुसरीकडे हेच रस्ते वाहतूक नियमांचे पालन वाहनचालकांकडून होत नसल्याने मृत्युचे सापळे बनले आहेत. रस्ते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्रातही महामार्ग वाहतूक पोलिस विभागामार्फत जनजागृतीसह वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.